नाशिक : नाशिक रोड येथील मानव उत्थान मंचातर्फे रस्त्यावर झोपलेल्या गरिबांना अनाथांना सहाशे ब्लॅंकेट्स व गोधड्यांचे वाटप करण्यात आले. त्यांच्या या कृतीने भर थंडीत गरिबांवर मायेची ऊब पांघरली गेली.
या बाबत बोलताना संस्थेचे संस्थापक जगबीर सिंग म्हणाले, ‘आगामी काळात गोदाघाट परिसरातील अनाथांचे थंडीपासून संरक्षण करण्यासाठी तात्पुरते निवारागृह चालू करण्याचा निर्धार केला आहे. थंडीच्या दिवसात आपल्या घरातील जुने अथवा वापरात नसलेले कपडे गरिबांना घालायला दिले पाहिजे.’
पहिल्या टप्प्यात उपनगर, पपया नर्सरी व त्र्यंबकेश्वर बसस्थानक या परिसरात ब्लॅकेंट वाटप झाले. दुसऱ्या टप्प्यात पंचवटी, अमरधाम, गोदाघाट येथील गौरी पटांगण व भाजी बाजार परिसरात रात्री ब्लॅकेंटचे वाटप करण्यात आला. सुरुवातीला कार्यकर्त्यांनी बेघरांच्या राहण्याचे ठिकाण, त्यांची संख्या व त्यांच्या गरजा यांचा प्रत्यक्ष जागेवर जाऊन सर्व्हे केला. त्यानंतर वाटप करतेवेळी महिला व पुरुषांना वयानुरूप कुपनचे वाटप करण्यात आले. मग प्रत्यक्ष ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले. दोन्ही दिवस मिळून एकूण ५०० ब्लॅंकेट्स वाटण्यात आले; तसेच जुन्या कपड्यांपासून बनविलेल्या ८० गोधड्यांचेदेखील वाटप करण्यात आले.
यासाठी समाजातील विविध दानशूर व्यक्तींनी एक लाख दहा हजारांची मदत केली. ब्लॅंकेटसोबतच बेघरांच्या मुलांना बिस्किटांचे वाटप करण्यात आले. या दरम्यान लाभार्थींचा डिजिटल पद्धतीने अभिप्राय नोंदवून घेण्यात आला. समाजात नेहमीच दुर्लक्षित असलेल्या गरीब बेघरांना ‘बिइंग सांता’च्या माध्यमातून उब मिळाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर फुललेले हास्य नव्या कामासाठी ऊर्जा देणारे होते, असे संस्थेच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.
या उपक्रमात जसमीत शेमी, खुशबू शर्मा, स्वप्नील घिया, गौरी सालकर, सौरभ आडके, साक्षी कांत, टिना शेमी, डिंपल माणकू, अर्चना सराफ, अनिल सिंग, विष्णू नायर आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.